बुधवार, १५ एप्रिल, २००९

कृष्णविवर

जेव्हा एखाद्या ता-याचा स्फोटात अंत होतो,
आणि आकाशातल्या रांगोळीतून
एक ठिपका हरवून जातो,

सगळंच काही संपत नाही...

प्रकाश लोपला तरीही, पदार्थ संपत नाही,
रिकामीशी वाटली तरी, पोकळी रिती रहात नाही...

मृत ता-याचंही एखादं कृष्णविवर बनतं
आणि आपल्याच आसपासच्या ग्रहगोलांना
आपल्यातच ओढत राहतं...

आयुष्याचंही काहीसं असंच असतं
मागे राहिलेलं, उणं-पुरं
मनाला आत, आत खेचत राहतं...

त्या गर्द अंधारात म्हणे,
सारं काही हरवून जातं,
पण मला वाटतं, तिथे
आयुष्य पुन्हा नव्यानं जन्म घेतं...
- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

रविवार, ५ एप्रिल, २००९

नदी

नदीला कुठे ठावूक असतं, तिच्या पाण्यात कसलं प्रतिबिंब पडणारेय?
नदीला कुठे ठावूक असतं, ते प्रतिबिंब कीती काळ राहणारेय?

तिच्या काठावर लोक येत जातात,
पाण्यातल्या सावल्याही तशा बदलत जातात...

नदीला कुठे ठावूक असतं?
सावल्यांचं आपलं असं एक जग नसतं...

पाण्याबरोबर तिला सावलीलाही वाहून न्यायचं असतं,
नदीला फक्त वाहत रहायचं असतं...

नदी वाहत जाते, तशा सावल्या धूसर होतात,
उठलेल्या लहरींमध्ये काही रंग मात्र उरतात.
आणि काठावरची माणसं,
प्रतिंबिंब हरवलं, म्हणून शोक करतात...

नदी,
ती तर फक्त वाहत राहते,
आणि समुद्राला जाऊन मिळते
नाहीतर अशीच लुप्त होते...

नदी,
समुद्राला मिळाली, तर तिचाच एक समुद्र बनतो
पण एखाद्या अमेझॉनसाठी
तोही थोडा मागं सरतो...

- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.